अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या साधारण महिनाभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या 74 वर्षाच्या होत्या. आपल्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत खडतर प्रवास केलेल्या माईंनी अनेक अनाथांना आपले केले आपल्या आयुष्यातील दुःखाचा डोंगर पार करत त्यांनी इतर दुखताना सावली दिली ज्यांना कोणी वाली नाही अशा हजारो अनाथ मुलांचा त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे नुसता संभाळत केला नाही तर त्यांना शिक्षण देणे पुढे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी-व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करणे त्यांची लग्न लावून देणे एकूणच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर हाडांची काढ करणाऱ्या माईंनी चार जानेवारी रोजी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र खरोखर अनाथ झाल्याची भावना समाजातून उमटत असून माईंच्या माये खाली वाढलेली हजारो अनाथ जीव तसेच महाराष्ट्रातील तमाम जनता शोकसागरात बुडाली आहे
कोण होत्या सिंधुताई सपकाळ ?
सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले
माईचे वैवाहिक जीवन
विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.
आयुष्यातील पहिले बंड
तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली
स्वतःचे दुःख विसरून बनल्या अनाथांची माय
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
सिंधुताईंना त्यांच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जवळपास 900 हून अधिक पुरस्कार प्राप्त आहेत त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त होता. नुकतेच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते
#पद्मश्री #सिंधुताईसपकाळ #निधन
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा