दुर्लक्षित समाजघटकांना प्रकाशात आणण्याचे काम साहित्याने केले- आमदार प्रशांत परिचारक
 |
'पंढरीचे मानबिंदू' व 'र ला र अन ट ला ट' पुस्तक प्रकाशन करताना मान्यवर |
पंढरपूर- ( बातमीदार ) "कोणत्याही देशाच्या शहराच्या आणि समाजाच्या उभारणीत अनेक निस्वार्थ काम करणाऱ्यांचा सहभाग असतो, परंतु त्यातील अनेक लोक हे नेहमी पडद्यामागे राहतात. अशा दुर्लक्षित, परंतु महत्त्वाच्या समाजघटकांना प्रकाशात आणण्याचे काम साहित्यिक आणि त्यांचे साहित्य करत असते. 'पंढरीचे मानबिंदू' या पुस्तकातून दत्तात्रय तरळगट्टी यांनी पंढरपूरच्या विकासात हातभार लावणाऱ्या अशाच व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करून त्यांचे कार्य समाजासमोर आणले आहे" असे प्रतिपादन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. ते दत्तात्रय तरळगट्टी यांनी लिहिलेल्या 'पंढरीचे मानबिंदू' व 'र ला र अन ट ला ट' या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात बोलत होते
 |
'पंढरीचे मानबिंदू' |
पंढरपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक दत्तात्रय तरळगट्टी यांनी 'पंढरीचे मानबिंदू' या नावाचे व्यक्तिचित्रण सदर पंढरी संचार या वृत्तपत्रासाठी लिहिले होते. हे सदर पंढरपूर आणि परिसरात खूपच लोकप्रिय ठरले होते. या सदरासाठी लिहिलेल्या व्यक्तिचित्रण लेखांचे एक पुस्तक करावे, असे अनेक वाचकांनी सुचवल्याप्रमाणे तरळगट्टी यांच्या या लेखमालेचे पंढरीचे मानबिंदू याच नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
 |
'र ला र अन ट ला ट' (कवितासंग्रह) |
तसेच दत्तात्रय तरळगट्टी हे कवी आहेत. त्यांच्या कवितांचा 'र ला र अन ट ला ट' हा कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित करण्यात आला. समिक्षा पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेच्या कला मंचावर संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात, पंढरी संचार चे संपादक, अनिरुद्ध बडवे, ज्येष्ठ साहित्यिका मानसी ताई केसकर, मसापचे कार्यवाह कल्याण शिंदे, माजी मुख्याध्यापक वि. मा. मिरासदार, माजी आमदार दीपक साळुंखे, नानासाहेब रत्नपारखी, समिक्षा पब्लिकेशन च्या संपादिका संध्या काळे, डबीर सर, एस. पी. कुलकर्णी सर, अण्णा तरळगट्टी आदी मान्यवर आणि साहित्य रसिक उपस्थित होते.