पंढरपुरात सूर्याजी महाराज भोसले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
आपले दैनिक कर्तव्य बजावत असतानाच अध्यात्मात निरंतर रत राहणे हाच परमार्थाचा योग्य आणि खरा मार्ग आहे. हाच आदर्श संतपरंपरेने समाजाला दिला असून, ‘सकळांशी येथे आहे अधिकार’ या न्यायाने संतसाहित्य अभ्यासक ह.भ.प. सूर्याजी महाराज भोसले हा वसा निरंतर पुढे चालवत आहेत, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
येथील सेतुबंध प्रकाशनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ह.भ.प. सूर्याजी महाराज भोसले यांच्या ‘सकळांशी येथे आहे अधिकार’ या चौथ्या लेखसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे चालक-मालक ह.भ.प. श्रीगुरु भागवत महाराज चवरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
आपल्या भाषणात इंगळे महाराज पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रातील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी हे संस्कारक्षम होण्यासाठी प्रवेश घेतात. या संस्था संस्कार घडवण्याचे पवित्र कार्य करतात. त्यामुळे त्यांना बालसुधारगृहाचे जाचक नियम लावून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा आणू नये. हे संस्काराचे कार्य अविरत सुरू राहण्यासाठी पत्रकार आणि शासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी."
सत्काराला उत्तर देताना ग्रंथाचे लेखक ह.भ.प. सूर्याजी महाराज भोसले म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्थेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक ठरेल. साधकांना याचा नक्कीच फायदा होणार असून, यापुढेही विद्यार्थ्यांसाठी निरंतर लेखन करण्याचा आपला प्रयत्न राहील.
सुप्रसिद्ध कवी तथा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सूर्याजी महाराजांचा संघर्षमय साहित्यिक जीवनप्रवास उलगडून दाखवला व पुस्तकाच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी विशद करत ग्रंथाला शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील भानुदास महाराज बारडोले, कीर्तनकार शिवाजी महाराज पवार, विठाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मृदंगाचार्य संतोष कवडे महाराज, तपोवनचे विश्वस्त शिवाजी भोसले, राजेश पवार, महादेव घाडगे, साहेबराव जगदाळे, संस्था अध्यक्षा सौ. माधुरीताई भोसले यांच्यासह विठाई वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी आणि विविध भागांतून आलेले वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कवडे यांनी केले, तर आभार विश्वविक्रम वीर कवी रवि वसंत सोनार यांनी मानले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक आणि लेखक अंकुश गाजरे यांनी केले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























