पंचगंगेसह उपनद्यांना पूर; राजाराम, रुईसह जिल्ह्यातील १६ बंधारे पाण्याखाली
शिवशाही वृत्तसेवा, कोल्हापूर, (जिमाका)
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणात सध्या ८.३६ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या अधिकृत अहवालानुसार, राधानगरी धरणातून सध्या कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसला तरी नद्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
१६ बंधारे पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत
नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे ७ बंधारे; भोगावती नदीवरील सरकारी कोगे व खडक कोगे; कासारी नदीवरील यवलूज; कुंभी नदीवरील सांगरुळ; वारणा नदीवरील कोडोली, तसेच दूधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी हे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
वारणा धरणात सर्वाधिक ३४.३९ टीएमसी साठा
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा ओघ सुरूच आहे. सद्यस्थितीला वारणा धरणात सर्वाधिक ३४.३९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्याखालोखाल दूधगंगा धरणात २५.३९ टीएमसी साठा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे: पाटगाव (३.७१ टीएमसी), तुळशी (३.४७ टीएमसी), धामणी (३.८५ टीएमसी), कासारी (२.७७ टीएमसी), कुंभी (२.७१ टीएमसी), कडवी (२.५१ टीएमसी), चित्री (१.८८ टीएमसी), घटप्रभा (१.५६ टीएमसी), चिकोत्रा (१.५२ टीएमसी), आंबेआहोळ (१.२४ टीएमसी), जंगमहट्टी (१.२२ टीएमसी), जांबरे (०.८२ टीएमसी) आणि सर्फनाला धरणात ०.६७ टीएमसी साठा उपलब्ध आहे.
राजाराम आणि रुई बंधाऱ्याची पातळी वाढली
नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून प्रमुख बंधाऱ्यांची पाणी पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. आज सकाळी नोंदवण्यात आलेल्या पातळीनुसार, रुई बंधारा ५६ फूट, इचलकरंजी ५४.३ फूट, तेरवाड ५१.३ फूट, नृसिंहवाडी ४६.६ फूट, तर शिरोळ बंधाऱ्याची पातळी ४२.६ फुटांवर पोहोचली आहे. तसेच राजाराम बंधाऱ्याची पातळी २२.८ फूट आणि सुर्वे बंधाऱ्याची पातळी २४.८ फूट नोंदवली गेली आहे. कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे कृष्णानदीची पातळी १५.१० फूट इतकी झाली आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



