प्रदूषण मुक्तीचा लढा उभारूया.. निसर्ग सारा फुलवूया.. श्रीरंग काटेकर
शिवशाही वृत्तसेवा सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जल वायू ध्वनी प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना मानवी जीवनाच्या अस्तित्वालाच भविष्यात आव्हान देणार असल्याचे सध्याच्या हवामानातील बदलातून दिसून येत आहे. पृथ्वीवरील ओझोन वायुचे घटते प्रमाण हे खरे तर प्रत्येक घटकाला आत्मचिंतन करणारे ठरत आहे. वास्तविक याकडे होणाऱ्या दुर्लक्षणामुळे निसर्गातील सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातही प्रदूषणाचे लोण पसरले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील नागरिक आता हैराण झाले आहेत. अनेक जन शुद्ध हवेच्या शोधासाठी डोंगर व दऱ्याखोऱ्यातील निसर्गातील आस्वाद घेण्यासाठी भटकंती करीत असतात. दिवसेंदिवस जल वायू व ध्वनी प्रदूषणाचा धोका पाहता नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वास्तविक या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण याचाही शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे.
शुद्ध हवा व प्रदूषण मुक्त वातावरण यासाठी प्रशासन व लोकसहभाग यांचा संगम खऱ्या अर्थाने निर्माण झाल्यास या परिस्थितीला आपण सर्वजण बऱ्यापैकी आटोक्यात आणू शकतो. अर्थात यासाठी प्रत्येकाने प्रबळ इच्छाशक्ती जागृत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारधारा प्रदूषणावर मात निश्चित करू शकते याविषयी गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा यांचा विशेष लेख...
मानवी जीवनाच्या अस्तित्वालाच खऱ्या अर्थाने धोका निर्माण करणारे निसर्गातील वाढते प्रदूषण हे एक आव्हान उभे राहिले आहे. जल वायू व ध्वनी प्रदूषणाचा धोका मानवी जीवनाबरोबरच निसर्गातील जीवसृष्टी पुढेही निर्माण झाला आहे. प्रदूषणाचे वाढते प्रमाण पाहता यावर ठोस व प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी प्रत्येक घटकांनी करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरी निमशहरी व आता ग्रामीण भागातील प्रदूषण विषय हा चर्चेचा बनला आहे. या प्रदूषणाचा मानवी शरीराच्या विविध अवयवांवर दुष्परिणाम करीत असून नागरिक विविध आजाराने त्रस्त झाले आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या मते निसर्गातील वाढते प्रदूषण विविध आजाराला प्रमुख कारणीभूत ठरत आहेत. हवेत मिसळणारे विषारी वायूमुळे हवा ही प्रदूषित होत आहे त्यामुळे अनेक गंभीर आजार यामुळे मानवाला निर्माण होत आहेत.
शहरी भागाचा विस्तार होत असताना झालेले औद्योगीकरण व यामधून निर्माण झालेला प्रदूषणाचा प्रश्न यावरती आता गांभीर्याने विचार मंथन होणे गरजेचे आहे. प्रशासन व लोकसहभाग यांनी आता खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन निसर्गसृष्टीचे जतन केले पाहिजे. शुद्ध हवेचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनीही आपले काय कर्तव्य व जबाबदारी याचे भान ठेवायला हवे तसेच प्रशासनाने ही आपली जबाबदारी ओळखून प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन्हींच्या एकत्रित प्रयत्नातून निश्चितच प्रदूषणावर मात करता येणे शक्य आहे. अन्न वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा बरोबरच प्रदूषण मुक्त वातावरण ही सुद्धा आता मानवाची खरी गरज बनली आहे.
भविष्यातील निसर्गातील बदलते हवामानातील आव्हाने व त्यावर प्रभावी उपाय योजना याबाबतीतही विचार मंथन होणे आवश्यक आहे. सध्या सातारा शहरातील हवामान पाहता प्रदूषणाची झळ आता सातारला ही बसू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचीही मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. चौका चौकात तर धुरांचे लोट हवेत मिसळताना दिसून येत आहेत. त्यातच ट्राफिक जाम च्या समस्येमुळे निर्माण होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. सातारकरांनी आता प्रदूषणाबाबत जागृत राहून आपले कर्तव्य आपली जबाबदारी व प्रशासनाचा सहभाग यांचा मेळ घालून प्रदूषण मुक्तीचा लढा उभारूया व सारा निसर्ग फुलऊया असा संकल्प करूया.
प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी काय करावे...
१. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करावेत.२. दूषित रासायनिक पदार्थ व रसायने ओढे व नदीपत्रात सोडू नये.३. प्लास्टिक कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीत टाकावा.४. वापरात असणारे वाहनातून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. नियमित देखभाल व पीयूसी करावी.५. प्रदूषण मुक्तीसाठी प्रबोधन व जनजागृती करावी.६. कचरा अथवा पालापाचोळा व टायर जाळू नये.
वायु गुणवत्ता व्यवस्थापनाकडून अपेक्षा....
१. चौका चौकात वायू गुणवत्ता फलकाची उभारणी करावी.२. ध्वनी वायु प्रदूषणा पासून होणाऱ्या धोक्याबाबत जनजागृती प्रबोधन करावे.३. ध्वनी वायु प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांवर निर्बंध घालावे. ४. पीयूसी नसणाऱ्या वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यास मनाई करावी.
पोलीस व आरटीओ विभागाकडून अपेक्षा..
१ध्वनी वायू प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करावी. २.वारंवार हा गुन्हा करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे नोंद करून वाहने जप्त करावीत.३. शहराच्या विविध भागातील चौका चौकात वाहनांची नियमित तपासणी करावी.४.प्रदूषण मुक्तीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी.
ध्वनी वायु प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शुद्ध हवेच्या अभावामुळे या ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजारांशी झुंज द्यावी लागत आहे. नाका तोंडात प्रदूषणाचे धूर जाऊन श्वसनाचे विविध आजार होत आहेत. विशेषता दमा कर्करोग तसेच ब्रेन स्ट्रोक तसेच डोळ्याची जळजळ व डोकेदुखीच्या व्याधीचे ते शिकार होत आहेत.
निसर्गाचा समतोल राखणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भावी पिढीला निसर्गाचा खरा अर्थाने आस्वाद घेण्यासाठी आत्ताच प्रदूषण मुक्ती विरोधात धोरण ठरवले पाहिजे. प्रदूषणामुळे मानवी शरीरावर घडणारे बदल पाहता भविष्यात मानवी जीवनापुढे मोठे संकट उभे ठाकले जाणार आहे. काळाची गरज ओळखून प्रत्येक घटकांनी निसर्गाचे संरक्षण व प्रदूषणावर मात करण्याचा ध्यास घेऊन वाटचालीचा ध्यास घेतला पाहिजे. सृष्टीतील जीव सृष्टीचे रक्षण करणे हे आपल्याच हाती आहे याची जाणीव प्रत्येक घटकांनी ठेवली पाहिजे..
श्रीरंग काटेकर जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा .
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



