तगड्या जनसंपर्कामुळे पक्षाची कदमांना पसंती
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत यादी आज नवी दिल्ली येथून जाहीर केली. या बहुप्रतीक्षित यादीमध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. धैर्यशील कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि तर्क-वितर्कांना आता पूर्णविराम मिळाला असून, महायुती आणि भाजपच्या गोटात प्रचाराची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
तीव्र रस्सीखेच आणि भाजपचा निर्णय: सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आणि भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोठी रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून शेखर गोरे, धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती, तर सांगलीतूनही काही प्रमुख नेत्यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र, पक्षाने उमेदवाराची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील दांडगा जनसंपर्क अत्यंत बारकाईने लक्षात घेऊन अखेर धैर्यशील कदम यांना विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महायुतीकडे या विशिष्ट मतदारसंघात तब्बल ६३० मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने भाजपच्या या उमेदवारीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून कदम यांचे पारडे जड मानले जात आहे.
राष्ट्रीय महासचिवांच्या स्वाक्षरीने यादी प्रसिद्ध: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण १० मतदारसंघांतील उमेदवार आणि एका जागेसाठीची पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे.
राज्यातील इतर प्रमुख मतदारसंघांतील भाजपचे अधिकृत उमेदवारसांगली-सातारा : धैर्यशील कदमसोलापूर : राजेंद्र राऊतअहिल्यानगर : प्राजक्त तनपुरेवर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणीभंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकरअमरावती : प्रवीण पोटे पाटीलछत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाटनांदेड : अमर राजूरकरधाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटीलजळगाव : नंदकिशोर महाजननागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार
केंद्रीय समितीने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सातारा-सांगलीमध्ये ६३० मतांच्या बळामुळे महायुतीचे कार्यकर्ते कमालीच्या उत्साहात असून, प्रत्यक्ष मतदारांच्या (स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या) गाठीभेटी घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



