दुष्काळात होरपळलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये संताप
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई.केवायसी करून दोन आठवडे झाले, मात्र अद्याप दुष्काळी अनुदानाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. दुष्काळी अनुदानाचे पैसे मंजूर होऊनही ते पैसे खात्यात टाकण्यास विलंब होत असल्याने दुष्काळात होरपळलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सिंदखेड राजा तालुक्यात गारपीट, अतिवृष्टी व अवेळी पाऊस झाला. यामुळेपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. सिंदखेड राजा तालुक्यातील सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा होणार होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ई केवायसी करून घ्यावी; अन्यथा अनुदान मिळणार नाही, असे आवाहन महसूल विभागाने केले होते. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन पन्नास ते शंभर रुपये देऊन ई केवायसी करून घेतले. त्यानुसार शेतकऱ्यांना आपल्या खात्यावर किती रुपये येणार आहेत, याची माहिती समजली.
अनुदान शंभर टक्के मिळेल, अशी अपेक्षा असताना केवळ ७५ टक्के नुकसान दाखवल्याने सरासरी ३ हजार २६५ रुपये एकरी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्याची मर्यादा साडेसात एकरपर्यंत आहे. तालुक्यासाठी ६८ कोटी रुपये मंजुरात आहे. पैसे मंजूर असताना केवायसीदेखील केली असताना अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. पैसे आले की नाही? यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. पंधरा दिवसांचा कालावधी उठूनदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा