जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सातारा जिल्ह्यात वेग आला आहे. पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करताना अपात्र व्यक्तींची नावे वगळण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पुनरिक्षण मोहिमेसाठी तब्बल ३ हजार ५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने कोणतीही दिरंगाई न करता प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
ग्रामीण भागातील कामावर गटविकास अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, तसेच पुनरिक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना आवश्यक ती कार्यमुक्ती देऊन त्यांच्या अध्यापनाची जबाबदारी इतर शिक्षकांकडे सोपवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी करताना आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी करावी. पात्र मतदार वंचित राहणार नाहीत आणि अपात्र नावांना मतदार यादीत स्थान मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



