मारुती पाटील यांना जिल्हा परिषदेचा मानाचा कृषी पुरस्कार!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सातारा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने 'कृषी दिना'चे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्यात साळशिरंबे गावचे सुपुत्र मारुती पाटील यांना शेती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
मारुती पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब केला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवता येईल, याकडे त्यांचा नेहमी कल राहिला आहे. फलोत्पादन शेतीमध्ये त्यांनी केलेले प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आणि किफायतशीर शेतीच्या मॉडेलबद्दल जिल्हा परिषदेकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली आहे.
पुरस्काराला उत्तर देताना भावनिक होऊन मारुती पाटील यावेळी म्हणाले, "शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न बघता, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाची जोड दिली, तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाचा आणि मार्गदर्शकांचा सन्मान आहे."
मारुती पाटील यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साळशिरंबे गावासह संपूर्ण उंडाळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कृषी क्षेत्रातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



