सरदार कान्होजी जेधे यांच्या चरित्र ग्रथांचे प्रकाशन
सातारा - (बातमीदार ) शहाजीराजांचे विश्वासू सहकारी आणि छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापने कामी एकनिष्ठ सहकारी लढवैया, शूर सरदार कानोजी जेधे यांचा जीवनपट उलगडणारा 'स्वराज्य निष्ठेचे प्रतीक कान्होजी जेधे ' हा चरित्र ग्रथ प्रा. विलास सोनवणे यांनी लिहिला आहे . या ग्रथांचे प्रकाशन समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगड येथील समाधी मंदिरात संपन्न झाले. या पुस्तकाचे प्रकाशन करून पुस्तकाची एक प्रत समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करण्यात आली. यावेळी सरदार कान्होजी जेधे यांचे चौदावे वंशज श्री बबनराव जेधे , रामदास स्वामी संस्थांनचे व्यवस्थापक नंदकुमार मराठे सर , स. भ. पु. व. कुलकर्णी गुरुजी, सज्जनगडावरील पाठशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि गडावर दर्शनासाठी आलेले सर्मथ भक्त उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर स. भ. पु. व. कुलकर्णी गुरुजी यांनी उपस्थितांना पुस्तकाविषयी माहिती दिली आणि पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवले. तर सरदार कान्होजी जेधे यांचे चौदावे वंशज श्री बबन राव जेधे यांनी कान्होजी जेधे यांच्याविषयी सांगितले. ते असे होते .
जैसे हनुमंत अंगद रघुनाथाला !
तैसे जेधे बांदल शिवरायांना !!
या वरून कान्होजी जेधे यांचे महत्त्व दिसून येते. रोहिड खोऱ्यातील करी-आंबवडे या गावासह चार गावांचे ते वतनदार देशमुख होते. शहाजी महाराजांशी त्यांचा लोभ जडला व ते एकमेकांचे जिवलग मित्र झाले. शहाजी राज्याबरोबर ते कर्नाटकात बंगरुळला गेले. इकडे शिवरायांचे उमदे नेतृत्व स्वराज्यस्थापनेच्या कार्याला लागले होते. पुणे जहागिरीचा कारभार सांभाळण्यासाठी दादोजी कोंडदेव व त्यांना मदत करीत होते. वृद्धापकाळाने दादोजी कोंडदेव मृत्यू पावले.तेंव्हा शहाजी राज्यांनी कान्होजी जेधे यांना शिवरायांना सहकार्य करण्यासाठी पुणे जहागीर पाठवले. हळूहळू स्वराज्याचा विस्तार होत होता.शहाजी राज्यांचे समवयस्क व विश्वासू कान्होजींना शिवराय आदराने वागवत. प्रत्येक प्रसंगी त्यांचा सल्ला घेत. सन .१६५९ नोव्हेंबरमध्ये विजापूरचा आदिलशाही बलाढ्य सरदार अफझलखान फार मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला व त्याने वाईला तळ ठोकला मावळ खोऱ्यातील सर्व वतनदार देशमुखांना त्याने फर्मान काढले. की. सर्वांनी येऊन मला मिळावे व मला मदत करावी असे नाही केले तर तुमचे वतन जप्त करून तुमच्या घरादाराची बायकामुलांची राखरांगोळी करिन. या धाकाने जावळीचे मोरे उभावळीचे खोपडे इत्यादि बडे वतनदार अफजलखानास मिळाले . परंतु कान्होजी जेधे खानाकडे गेले नाहीत. अशा कठीण प्रसंगी काय करायचे या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे म्हणून राजगडावर जिजाऊ साहेब व शिवरायांच्यात मसलत चालली होती. सगळे प्रमुख मावळे जमले होते. तेंव्हा शिवराय म्हणाले, कान्होजी बाबा तुमचा काय मनसुबा आहे.आधीच स्वराज्य व शिवराय संकटात असताना जे अफजल खानास मिळाले त्याच्या विषयीचा राग कान्होजींच्या मनाला चटके देत होता. महाराज म्हणतात कान्होजी बाबा तुम्ही खानाकडे जा तुमचे वतन व प्राण वाचवा. आम्ही एकटे या संकटाला तोंड देतो,जे काय व्हायचे ते होईल.या बोलण्याने स्वाभिमानी व स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले कान्होजी ताडकन उठले व बाणेदारपणे उत्तर दिले. महाराज आम्ही वतन खान्यासाठी नाही जमलो; तर स्वराज्यासाठी बालिदान करण्यासाठी जमलो आहोत . वतनाची फिकीर आम्हाला नाही. स्वराज्यासाठीच जगायचं आणि स्वराज्यासाठीच मारायचं शहाजी राजेंना आम्ही वाचन दिलंय तेच आमचं वतन. आपल्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत यात अंतर पडणार नाही. भर दरबारात कान्होजींनी, आपली ५ मुले, वतन, व स्वतः यांना जिजाऊ साहेबांच्या व शिवरांच्या चरणांवर हात ठेवून शपथ घेतली व तुळशीपत्र ठेऊन पाणी सोडले. स्वराज्यासाठी व शिवरायांसाठी वतनावर व मुलांवर तुळशीपत्र ठेऊन अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा करू व स्वराज्यासाठी मरण पत्करू. असे म्हणून त्यांनी शिवरायांना मुजरा केला शिवरायांनी त्यांना गळा भेट दिली व ' सर्जेराव ' हा किताब दिला. पुढे प्रतापगडच्या संग्रामात त्यांनी व त्यांचा ५ ही मुलांनी मोठा पराक्रम गाजवला. १० नोव्हेंबर १६५९ ला खानाला ठार करून प्रतापगडच्या संग्रामात शिवरायांना मोठे विजय मिळाला . शहाजी महाराज, जिजाऊ माता, शिवराय व स्वराज्यावर कान्होजींनी प्रचंड निष्ठा होती. अशा ह्या पराक्रमी कर्तबगार निष्ठावंत कान्होजी जेधे यांचे प्रेरणादायी चरित्र अवश्य वाचा . ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी ट्रस्टच्या खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जेधे देशमुख यांनी केले आहे.
१) संपर्क :- राजे श्री कान्होजी नाईक जेधे देशमुख ट्रस्ट
मु.पो. कारी ता. भोर जि. पुणे :- ४१२२०६
मो. ८६६८७३९१६१
२) श्री बबनराव बाजीराव जेधे - देशमुख ( १४ वे वंशज )
कारी मो. ९९२१९४७६१४